गोदावरी खोऱ्यात बिबट्याचा वावर; हिंस्र श्वापदाच्या हल्ल्यात पाच बकऱ्या ठार, वनविभाग बेखबर!
पैठण पंचक्रोशीत खळबळ उडवून देणाऱ्या बिबट्याचा वावर गोदावरी नदीच्या खोऱ्यात अजूनही कायम

मदन आव्हाड, पैठण
पैठण: गतवर्षी बाप-लेकाचा बळी घेऊन पैठण पंचक्रोशीत खळबळ उडवून देणाऱ्या बिबट्याचा वावर गोदावरी नदीच्या खोऱ्यात अजूनही कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी (११ जून २०२५) सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास एका अज्ञात हिंस्र श्वापदाने एका शेळीपालकाच्या वाडग्यात शिरून पाच बकऱ्यांना ठार केले. त्यापैकी दोन पिल्ले हे श्वापद घेऊन पसार झाले. या हल्ल्यात शेळीपालकाचे तब्बल ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाला याची अद्याप साधी खबरही नाही.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पैठण शहराच्या पूर्वेकडील मौलाना दर्ग्याच्या पायथ्याशी, गोदावरी नदीच्या काठावर सय्यद रमीज सय्यद अहमद काद्री यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे काश्मिरी जातीच्या एकूण सोळा बकऱ्या आहेत. बुधवारी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान, एका अज्ञात हिंस्र श्वापदाने लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश करत पाच बकऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन लहान पिल्ले ते श्वापद घेऊन निघून गेले, तर इतर चार बकऱ्यांच्या नरडीचा घोट घेऊन त्यांना जागीच ठार केले.
सय्यद रमीज सय्यद अहमद काद्री यांनी वन्यजीव संरक्षण विभाग, पैठण कार्यालयात या घटनेची माहिती देण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना तेथे एकही अधिकारी उपस्थित दिसला नाही, अशी कैफियत त्यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडली.
या दुर्घटनेनंतर पैठण तलाठी, मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव संरक्षण संवर्धन विभागाने तात्काळ एकत्र येऊन पंचनामा करावा आणि शेळीपालक सय्यद रमीज सय्यद अहमद काद्री यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
वन्यजीव संरक्षण विभागाचे परिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल हे अडुळ, पाचोड, दावरवाडी, बालानगर, लोहगाव, बिडकीन या शिवारात केवळ अवैध वृक्षतोड आणि वन्यजीव शिकारींकडून ‘चिरीमिरी’ आणि ‘हप्ते’ वसूल करण्यात व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना याबाबत विचारणा केली असता, “आम्ही साईटवर असतो, आमचे काम ऑफिसमध्ये बसून नसते,” अशा थापा मारून ते वेळ मारून नेतात, असेही म्हटले जात आहे.
आता नुकतेच मृग नक्षत्र सुरू झाले आहे, या काळात घोरपड, ससा, मोर, हरीण अशा अनेक प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, वन्यजीव संरक्षण विभाग याकडे डोळे झाकून (मांजर दूध पिते) दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत काय करावे, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.