उसतोड कामगार मुलांसाठी ‘आनंददायी शिक्षणाची जत्रा’ उपक्रम; नाविन्यपूर्ण कार्यक्रमाला जालना जिल्ह्यात सुरुवात

प्रतिनिधी/जालना: जालना जिल्हा परिषद आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांनी गावातील शाळेत नियमित यावे आणि गावातच राहून शिक्षण घ्यावे, या उदात्त हेतूने ‘आनंददायी शिक्षणाची जत्रा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मासेगाव येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुलांसाठी विविध स्पर्धा व क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटींचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी कला, हस्तकला, संगीत, नाटक, नृत्य, कथाकथन यांसारख्या विविध प्रकारात आपला सहभाग नोंदवला. अशा क्रियाकलापांमुळे मुलांची कल्पनाशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो. नवीन गोष्टी तयार करणे किंवा विचार करणे मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढते, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
यावेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने ऊसतोड कामगारांना आणि त्यांच्या मुलांना पोषण मिळावे या हेतूने परसबाग (किचन गार्डन) किटचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले, प्रकल्प संपर्क प्रमुख भाऊसाहेब गुजाळ, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव, जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, तसेच गाव स्वयंसेवक राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे, अजय गाढे, आकाश चौगुले, योगेश आढे, महादेव खरात हे उपस्थित होते.