महाराष्ट्र

मराठी तेलुगू भाषिक अनुबंध : संस्कृतीच्या परस्पर संबंधाचा शोध घेणारे पुस्तक

भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.हवेशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही तसे भाषेशिवायही जिवंत राहू शकत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपल्या मनातील विचारभावना व्यक्त केल्याशिवाय त्याचे मन हलके होत नाही. दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी, माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी, व्यवहार पूर्तीसाठी भाषेचा उपयोग केला जातो. भाषेद्वारे केवळ संवादच साधला जातो असे नव्हे तर मानवी भावना, विचार, कल्पना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा आहे. भाषा अगोदर का मानव अगोदर? हा प्रश्नही आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. परंतु अगोदर मानवाची निर्मिती झाली. सुरुवातीला तो एकएकटा राहत होता.नंतर तो समूहाने रहायला लागला‌.त्यावेळी त्याला विचाराची देवाण घेवाण करण्याची आवश्यकता भासली. भय, दुःख, आनंद व्यक्त करण्यासाठीचे माध्यम असणे त्याला गरजेचे वाटू लागले. त्यातूनच हावभावाची भाषा आली. त्याचा विकास होत चिन्ह, चित्र, ध्वनी, शब्द भाषा उदयास आली.

समूहाने राहणाऱ्या माणसांचे संरक्षणाचे प्रश्न मार्गी लागले तसतसे इतर गरजा त्याच्या समोर उभ्या राहिल्या. त्यातूनच मनोरंजन, सणवार, पूजाविधी साजरे होऊ लागले. हे चालू झाल्यानंतर संस्कृती पाय रोऊ लागली. प्रदेशवार बोलीभाषा बोलल्या जाऊ लागल्या. प्रत्येकाने आपआपली संस्कृती जपली.ज्यावेळी आदान प्रदानाला सुरुवात झाली तेव्हा संस्कृतीचेही आदान प्रदान होणे क्रमप्राप्त झाले. त्यातूनच एका भाषिकाचा दुसऱ्या
भाषिकाशी संबंध यायला लागला. भाषा ही परिवर्तनशील, लवचिक असल्यामुळे ती बदल स्वीकारू लागली. त्यामुळे अनेक भाषेचा विविध माध्यमातून अनुबंध होऊ लागला. असाच एक अनुबंध कशा पद्धतीने आला याचा चिकित्ताक अभ्यास डॉ.दत्तराम राठोड यांनी मराठी तेलुगू भाषेच्या संदर्भात केला. त्या अभ्यासाची फलश्रुती म्हणजेच हे पुस्तक होय.

डॉ. दत्तराम राठोड हे व्यवसायाने पोलिस अधीक्षक आहेत. पण उत्तम अभ्यासक आहेत. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे सांभाळत ते मराठी भाषेची सेवा करत आहेत. अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी कठोर मेहनतीच्या बळावर विविध २५ पदव्या संपादन केल्या. खरेतर पोलिस खाते म्हणजे खूप व्यस्त असणारे खाते आहे. अनेक भार सांभाळून त्यांनी अभ्यासाचे सातत्य राखले. म्हणतात ना, ‘आवड असल्यानंतर सवड मिळते’. अगदी त्याच न्यायाने ते कार्य करताना दिसतात. संधीचे सोने करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राठोड असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण गडचिरोली येथे पहिलीच पोस्टींग मिळाली.ती त्यांनी आनंदाने स्वीकारली. या भागात बरेच अधिकारी पोस्टिंग मिळाल्यानंतर जॉइन होत नाहीत.पण राठोड यांनी ते आव्हान संधी म्हणून स्वीकारले. आणि तेथील भाषेचा, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला. कोणतीही गोष्ट सकारात्मक पद्धतीने स्वीकारली तर त्यात यश संपादन करणे सोपे जाते. अगदी त्याच न्यायाने त्यांनी त्या भागातील भाषेवर पीएचडी केली आणि त्याचेच पुन्हा पुस्तक तयार झाले. पुस्तकम्हणजे ‘मराठी तेलुगू भाषिक अनुबंध होय.

लेखकाने दक्षिण सीमावर्ती गडचिरोली भागात मराठी भाषेवर तेलुगुचा पडलेला सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव कसा होता? हे उलगडून दाखवले. प्रत्येक भाषेमध्ये संस्कृतीचे पदर असतात असेच पदर
मराठी आणि तेलुगू भाषेमध्ये आहेत. महाराष्ट्रातील आरे लोक आंध्र प्रदेशात जाऊन स्थायिक झाले. जाताना इकडचा सांस्कृतिक वारसा तिकडे नेला. असा भाषेवर पडलेला प्रभाव यांचे चिंतन आणि मंथन राठोड यांनी करून नव अभ्यासकांना पुस्तकाच्या माध्यमातून नवशिदोरी दिली. कुणबी ग्रामीण गीताच्या माध्यमातून हा अनुबंध जोडला गेल्याचे अनेक उदाहरणे त्यांनी दिली. यामध्ये वैवाहिक गीते, देवदेवतांना आवाहन करणारी गीते, हळद, पूजा, देवक, गोंडर्ला, ओटी भरणे, नामकरण, भावगीते अशा विविध गीतातून संस्कृती जपण्याचे काम झालेले पहायला मिळते. त्याचा सविस्तर अभ्यास लेखकांनी केला.

‘ कुंभार माझ दाद बरलाल जात होता वोरे त्याला रुपियाचा गरबु ‘
किंवा
‘गागाकोरी पंगास माल माझा
एगा गोरे डोंगरा सेतु माझा सकक्कळे उडूनू सुली सारावो मी
एइनरे वंपा संसार रीतु माझा ‘
अशा गीताने नातेसंबंध,विधी, रितीरिवाज, सण समारंभ, मानवी स्वभाव विविधांगी पातळीवरून रेखाटलेले पहायला मिळते.

महाराष्ट्र व तेलंगणा या सरहद्दीवरील प्रांतातील कुणबी लोकांचे आचार-विचार व व्यवहार यामध्ये फरक जाणवतो. त्याचा विवेचक अभ्यास राठोड यांनी केला. तर काही साम्यही आढळते. जसे की चांद्रमान पंद्धतीने आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र व कर्नाटकातील लोक हे चैत्र शु‌द्ध प्रतिपदेला नववर्ष प्रारंभाला गुढीपाडवा हा सण साजरा करतात. तर तेलंगणा प्रांतामध्ये स्थायिक झालेल्या निर्वासित कुणबी लोकांची काही वेगळी लक्षणेही पहायला मिळाली. जसे की हे कुणबी लोक शाकाहारी आहेत, ते जाणवे धारण करत नाहीत.अशा विविध विषयाच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केला.
त्या काळामध्ये लिहिलेल्या जानपद साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. यामध्ये स्त्री गीते, सण उत्सव, गीत,कथा, कादंबरी, नाटक, नवीन रचना याचाही चिकित्सक पद्धतीने विचार मांडणारे हे पुस्तक आहे. साहित्यातील साम्य भेदाचा अभ्यास करून त्याला अतिशय मार्मिकपणे शब्दबद्ध केले. आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या संस्कृतीच्या परस्परावर असलेला प्रभाव दोन्ही भाषेतील समाज, चालीरीती, जीवन व सांस्कृतिक जीवन, रूढी परंपरा, विवाह पद्धती, सण यांचा प्रभाव मराठी लोकांवर कसा पडला. तेलुगु मधील ग्रामीण साहित्य कुणबी गीते याचा सांस्कृतिक प्रभाव अशा विविध अंगाने चिंतनातून आकारास आलेले पुस्तक हे अतिशय वाचनीय झालेले आहे.
ज्यांना दोन राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक ,साहित्यिक, भाषिक अंगाने अभ्यास करावयाचा आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दस्तावेज बनलेला आहे. संशोधन करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. राठोड यांनी खूप मेहनत करून, भ्रमंती करून ,लोकांशी संवाद साधून या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. या पुस्तकामुळे नवीन संशोधन करणाऱ्याला त्या प्रदेशात भटकंती करायची गरज भासणार नाही असे मला वाटते.अतिशय अभ्यासपूर्वक चिंतनातून आकरास आलेल्या

पुस्तकाचे वाचक स्वागत करतील असा मी आशावाद बाळवतो व लेखकाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा देतो.

समीक्षक
डॉ.नरसिंग अप्पासाहेब कदम प्रोफेसर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय,उदगीर जिल्हा लातूर तथा सदस्य, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई .९४०४७३१०१०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker