जालना : वक्फ संशोधन कायदा भारतीय राज्यघटने विरोधी ; मौलाना खालेद सैफुल्ला रहेमानी

जालना / प्रतिनिधी
देशाच्या संसदेत मंजूर करण्यात आलेले वादग्रस्त वक्फ सुधारणा कायदा केवळ भेदभाव आणि पक्षपातीपणाच्या आधारावर आहे. तर भारतीय संविधावर थेट हल्ला आहे. म्हणून केंद्र शासनाने हे विधेयक ताबडतोब मागे घ्यावे, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष मोलाना खालेद सैफुल्ला रहेमानी यांनी शनिवार रोजी ईदगाह मैदान कदिम जालना येथे आयोजित जाहीर निषेध सभेत केले. ते सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लाॕ बोर्डच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने जाहीर सभेत हजारोच्या संख्येने उपस्थित मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या विरोधात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, या सुधारणा मुस्लीम वक्फ मालमत्तांवरून त्या सर्व संरक्षण अधिकारांना काढून घेतात जे संरक्षण इतर धार्मिक समुदाय हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि बौध्द यांच्या देवस्थानांनाही दिलेले आहे हे स्पष्टपणे भेदभावकारक आहे.
आम्ही सर्वजण या वादग्रस्त सुधारणा कायद्याला संपूर्णपणे फेटाळतो आणि सरकारकडे मागणी करतो की, हे कायदे मागे घेत संविधान आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान करावा.
बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने वक्फ सुधारणा कायदा मंजूर करून देशातील मुस्लीम बांधवाच्या हक्क आणि अधिकारावर गदा आल्यामुळे देशातील घटना डळमळीत होतांना दिसत आहे. हे देशाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना उमरेन महफूज रहेमानी, डॉ. कासीम रसूल इलियास, नदिम सिद्दीकी, झियाउदीन सिद्दीकी, अजहर तांबोळी, मोलाना सोहेल नदवी, खान इकबाल पाशा, अब्दुल मुजीब यांच्यासह ईतरांची ऊपस्थिती होती.
खासदार डॉ. कल्याण काळे
या सभेत बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा लागू करून मुस्लिम समाजावर मोठा अन्याय केला आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाच्या पूर्ण ताकदीनिशी सोबत आहे. वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर देखील ऊतरू असा ईशारा खा.काळे यांनी दिलाय, या सभेत माजी आमदार राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जमाते इस्लामीचे अध्यक्ष शेख ईस्माईल,मौलाना रफियोद्दिन आशरफी,मुफ्ती अब्दुल रहमान,कार्यक्रमाचे संयोजक अ.रऊफ नदवी आदींनी ऊपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मौलाना मुफ्ती फईम,एजाज कासीम, शेख ईस्माईल,लियाकत अली खान यांनी केले. या सभेत जिल्ह्यातील मुस्लीम समाज बांधव हजारोंच्या संख्येने एकवटला होता. केंद्र सरकारने अमलात आणलेला हा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.