प्रकृती खालावली; मोझरीत जनसमुदाय उसळला, कार्यकर्ते आक्रमक
बच्चू कडूंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; १४ जूननंतर आंदोलनाची दिशा बदलणार

बादल डकरे
पोलीस न्यूज नेटवर्क । चांदूर बाजार
शेतकरी कर्जमाफीसह आपल्या १७ विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे माजी आमदार बच्चू कडू यांचे ८ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची १४ तारखेपर्यंत दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कडू यांनी आंदोलन सुरू करतानाच दिला होता.
आंदोलनाला पाच दिवस होऊनही सरकारकडून कुठलेच सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे. तिकडे आमदार बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले असताना, त्यांचे कार्यकर्ते मात्र आक्रमक पाहायला मिळत आहेत. बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा तसेच संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे सकाळी ७ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तिकडे मोझरी लगत असलेल्या डवरगाव येथे वसू महाराज यांच्या नेतृत्वात ‘अर्धदफन’ आंदोलन करण्यात आले.
अचलपूर-परतवाडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टॉवरवर शेतकरी चढले, तर चांदूरबाजारकडे येणाऱ्या परतवाडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. धामणगाव तालुक्यातही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. वरुड येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालयात ताबा घेत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.
चांदूरबाजार तालुक्यातील महिलांनीही तहसील कार्यालयावर मोर्चा हलवला. बच्चू कडू यांना काही बरेवाईट झाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच, चांदूरबाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा येथे सागर सोनारे, सौ. समीक्षा सोनारे आणि नेत्रा सोनारे यांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या सर्व घडामोडी होत असताना, सरकारने या आंदोलनाकडे सकारात्मकतेने पाहावे यासाठी अनेक आमदार, खासदार हे सरकारला सांगत आहेत. मात्र, त्याची दखल अद्यापही घेतली गेली नसल्याचे दिसत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत १४ जून २०२५ रोजी, शनिवारी, संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मोझरीत जनसमुदाय उसळला
बच्चू कडू यांची तब्येत खालावली असल्याने आता मोझरीत मोठ्या प्रमाणात राज्यातून जनसमुदाय गोळा होत आहे. यामध्ये शेतकरी, दिव्यांग, निराधार आणि कार्यकर्ते यांचा सहभाग आहे. त्यांनी १२ जून रोजी मोझरी येथे चक्काजाम आंदोलन केले.
१४ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन
बच्चू भाऊंच्या अन्नत्याग उपोषणाकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे यासाठी दिनांक १४ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हे आंदोलन अधिक जास्त तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.