
मुंबई: सोमवारची सकाळ मुंबईकरांसाठी एक भयानक बातमी घेऊन आली. मध्य रेल्वेच्या कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. सकाळी साधारण ९:३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात धावत्या ट्रेनमधून खाली पडून किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कसारा दिशेने जाणारी आणि सीएसएमटी दिशेने जाणारी या दोन्ही लोकल ट्रेन फास्ट लाईनवर होत्या. दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि दरवाज्यांवर लटकलेले प्रवासी एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या धडकेमुळे प्रवासी तोल जाऊन थेट रुळांवर कोसळले.
या घटनेची माहिती सर्वप्रथम कसारा लोकल ट्रेनच्या गार्डने रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने जवळच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने पाच प्रवाशांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, “अपघाताची माहिती मिळताच आम्ही तात्काळ मदतकार्य सुरू केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर घटनेच्या कारणांचे स्पष्ट चित्र समोर येईल.”
मृत्यू झालेल्या प्रवाशांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रेल्वे अधिकारी त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्या ट्रेनमधून किती प्रवासी खाली पडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.
हा अपघात पुन्हा एकदा मुंबई लोकलवरील अतिरिक्त भार आणि गर्दी व्यवस्थापनाच्या गंभीर समस्या अधोरेखित करतो. दररोज लाखो प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या या ट्रेनमधील सुरक्षेच्या मानकांची होणारी उपेक्षा प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनावर आता ठोस आणि त्वरित उपाययोजना करण्याचे दबाव आहे.