
बंगळूरू: एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावल्यानंतर आयोजित केलेल्या विजयोत्सवात प्रचंड गर्दी झाली होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांनी त्यांच्या तक्रारीत आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयाच्या उत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीसाठी विराट कोहलीला जबाबदार धरले आहे. मात्र, त्यांच्या या तक्रारीवर अद्याप कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
तत्पूर्वी, कर्नाटक पोलिसांनी चेंगराचेंगरीबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, आरोपी आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए, आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना यांनी आवश्यक परवानगीशिवाय विजयोत्सवाचे आयोजन केले होते.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोलँड गोम्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, आरसीबी फ्रँचायझी, केएससीए आणि डीएनए विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.