“दोन सख्खे चुलत भाऊ जांभळं खाण्यासाठी गेले… परत आलेच नाहीत!
पाण्यात बुडून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; गावावर शोककळा

जालना, – जाफराबाद तालुक्यातील देवळगाव देवी गावातून काळजाचा ठाव घेणारी घटना समोर आली आहे. जांभळं खाण्यासाठी सकाळी घराबाहेर गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा गावाजवळील नाल्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
मृत मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १०) आणि युवराज गौतम खरात (वय ९) अशी आहेत. सकाळी जांभळं तोडण्यासाठी गेलेल्या या दोघांनी खेळता-खेळता गावाजवळील नाल्याजवळ पोहोचून पोहण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नाल्यात बुडाले.
बराच वेळ होऊनही मुले घरी परतली नाहीत, तेव्हा कुटुंबीयांनी शोध सुरू केला. गावकऱ्यांनी नाल्यात शोध घेतल्यावर त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.