
सादिक शेख । पोलीस न्यूज नेटवर्क । आन्वा
लग्न हे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, दोन कुटुंबांचे आयुष्य जोडणारे पवित्र बंधन आहे. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत सध्या फसवणुकीचे प्रकार सर्रास अवलंबले जात आहेत. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली अनेक जण लोकांच्या भावनांशी खेळत आर्थिक लूटमार करत असल्याचे उघड झाले आहे.
ऑनलाइन माध्यमांपासून ते स्थानिक एजंट, दलाल, भोंदू बाबा तसेच काही विवाह मंडळांचे नाव वापरून फसवणूक करणारे वधू-वरांच्या कुटुंबीयांना अक्षरशः वेठीस धरत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मुलगा किंवा मुलगी दाखवून जुळवणी झाल्याचे भासवले जाते आणि त्यानंतर वधूपक्ष किंवा वरपक्षाकडून लाखो रुपये उकळले जातात. पैसे मिळाल्यावर संबंधित व्यक्ती गायब होते, त्यांचे फोन बंद होतात आणि प्रकरण थेट कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात जाऊन थांबते. विशेषतः, लग्नाचे वय झालेल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी हतबल झालेल्या पालकांना “आमच्याकडे लगेच योग्य जुळवणी होईल,” असे सांगून गंडवले जात आहे. अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या युगुलांकडून पैसे उकळण्यासाठी बनावट वधू-वर मेळावे किंवा ऑनलाइन विवाह जुळवणाऱ्या संस्थांचा वापर करून फसवणूक केली जात आहे. वय झाल्यानंतरही लग्न जुळत नसलेल्या मुला-मुलींना “आम्ही लग्न जुळवून देतो,” अशी बतावणी करून विशिष्ट टोळ्या पैसे उकळतात, परंतु शेवटी पदरी फसवणूकच येते. अशा प्रकारच्या घटना सर्वत्र घडत असून, अनेकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे.
‘अनोळखी मध्यस्थांपासून सावध राहा!’
“विवाहाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे विशेषतः अनोळखी मध्यस्थांपासून सावध राहा. अधिकृत विवाह नोंदणी आणि ओळख दस्तऐवज पडताळणी केल्याशिवाय कोणतीही आणि कुणाशीही आर्थिक देवाणघेवाण करू नका.”
– किरण बिडवे, पोलीस निरीक्षक, भोकरदन