blogBusinessFoodsGamesLife StyleTechTravelइतरक्राइमक्राइम स्टोरीक्रीडादेश-विदेशभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

बदनापूर बस स्थानकाजवळील अपघातांवर नियंत्रण कधी?

गतिरोधकांच्या अभावी जीवघेणा महामार्ग, प्रवाशांचा जीव धोक्यात

बदनापूर / डॉ. परवीन नजाकत सय्यद
आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बदनापूर बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे बस स्थानक झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या बस स्थानकातून बाहेर पडताना आणि आत येताना बसेसना अपघातांचा धोका पत्करावा लागतो. गतिरोधक नसल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होऊन वादविवाद वाढले आहेत. एकंदरीत, अपघातांना निमंत्रण दिले जात असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
बदनापूर तालुक्याचे ठिकाण असूनही बस स्थानक नसल्यामुळे जलद आणि अतिजलद बसेस येथे थांबा न घेता सरळ निघून जात होत्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मागील तीस वर्षांपासून बदनापूर बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनीही परिश्रम घेतले होते. दरम्यान, आमदार नारायण कुचे यांनी विशेष प्रयत्न करून २०२३ मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करत बस स्थानक मंजूर करून घेतले. त्यानंतर तात्काळ कामास प्रारंभ होऊन त्याचे उद्घाटनही झाले.
बस स्थानक सुरू झाल्यापासून काही प्रमाणात बसेसची ये-जा सुरू झाली आहे. पाठोपाठ येथे रिक्षांची वर्दळही वाढली आहे. परंतु, बस स्थानक छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर असल्याने आणि या महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे बसेसना बस स्थानकात प्रवेश करताना धोका निर्माण झाला आहे. दररोज अपघात होऊन वादविवाद होत आहेत. काही दिवसांपूर्वीच, बस स्थानकातून एक बस बाहेर निघत असताना एक चारचाकी वाहन भरधाव वेगात आले आणि बसला धडकणार होते. मात्र, बस चालकाने सावधगिरी बाळगल्याने मोठा अपघात टळला. असे असतानाही, त्या चारचाकी वाहनधारकाने बसचा पाठलाग करून बस चालकाला मारहाण केली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, नुकतेच तीन दुचाकीस्वार बसेसना धडकून जखमी झाले आहेत.
एकंदरीत, जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बदनापूर बस स्थानकाजवळ गतिरोधक नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असतानाही, महामार्गाची वसुली करणारी टोल कंपनी सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. बदनापूर बस स्थानक, पाथ्रीकर कॉलेज, आमदार नारायण कुचे यांचे संपर्क कार्यालय, रावसाहेब दानवे कॉलेज तसेच शहरालगत गतिरोधक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत असून, गतिरोधकांअभावी नागरिक आणि प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.

विभाग नियंत्रकाचे पत्र
जालना जिल्हा परिवहन महामंडळ विभाग नियंत्रकांनी नागेवाडी टोल नाका व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर बदनापूर बस स्थानकाजवळ गतिरोधक नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचे म्हटले आहे. उताराचा भाग असल्यामुळे वाहने भरधाव वेगात येतात आणि त्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

0
गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन!
“बदनापूर बस स्थानक, शहरालगत तसेच शैक्षणिक संस्था आणि आमदार संपर्क कार्यालय या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. परंतु, महामार्ग असल्यामुळे वाहने भरधाव वेगात असतात आणि अपघात होतात. हा महामार्ग आता जीवघेणा रस्ता बनला आहे. तात्काळ सर्व ठिकाणी गतिरोधक बसवावे, अन्यथा टोल नाक्यावर आंदोलन केले जाईल.”
अकरम खान पठाण, अध्यक्ष, महाराष्ट्र मुस्लिम तेली संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker