
पोलीस न्यूज नेटवर्क / जालना:
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार गुंड सुयोग सोळुंके याने जिल्हाबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन करत आपेगाव येथील नदीपात्रात येऊन एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित समीर पठाण यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, या गुंडापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अंबड तालुक्यात घरकुल मंजूर असल्याने, समीर पठाण हे महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपेगाव शिवारातून वाळू उपसा करून लाभार्थ्यांना पुरवत असत. मात्र, ५ जून रोजी दुपारी समीर पठाण नदीपात्रातून वाळू उपसा करत असताना, गुंड आणि वाळूमाफिया सुयोग सोळुंकेने महसूल अधिकाऱ्यासमोरच समीर पठाणला शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नाही तर, “पुन्हा या पात्रात दिसला तर जिवे मारण्याची धमकी दिली,” असेही पठाण यांनी सांगितले.
तडीपारीचा आदेश झुगारून हे हिंसक कृत्य करणाऱ्या सुयोग सोळुंकेविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सोळुंकेविरोधात बेकायदा वाळू उत्खनन, मारहाण, चोरी, आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याच कारणामुळे सोळुंकेला फेब्रुवारी-२०२५ मध्ये जालना, बीड आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यांतून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते.
तडीपारीचे आदेश झुगारून सुयोग सोळुंके हा वाळूमाफिया अंबडमध्ये कधी आणि कसा आला, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.